स्वप्नसृष्टी -
आजकाल स्वस्थ जीवन दुर्मिळ झाले आहे. प्राचीन काळापासून जीवनात संघर्ष चालूच आहे. या विज्ञान युगात काही जुने संघर्ष पंगु पडले आहेत तर नवीन संघर्ष वाढले आहेत. एकूण जीवन म्हणजे वाढत्या संघर्षाशी मुकाबला. अस्वस्थ जीवन आता पाचवीलाच पुजले आहे. पूर्ण शरीर स्वास्थ्याचा अभाव, त्यामुळे झोपेचे खोबरे. खंडित झोप म्हणजे स्वप्नांची जननी.
साधारणपणे स्वप्ने रात्री झोपल्यावर पडतात. स्वप्नांसोबत अनेक लोककल्पना प्रचलित आहेत. रात्रीचे सुरुवातीला पडणारी स्वप्ने काही वर्षांनी फलदायी होत्तात. मध्यरात्री पडणारी स्वप्ने सहा महिन्यात फलदायी होतात. पाहते पडणारी स्वप्ने महिना / पंधरा दिवसात फलदायी होतात. स्वप्नात स्वतःला जेवताना पाहणे मृत्युपर आहे अशी कल्पना कितपत खऱ्या आहेत? त्याचे पाठीमागे काय शास्त्र आहे ? भारतीय तत्त्वज्ञान त्याबाबत काय निर्णय देते? ज्योतिष शास्त्रात स्वप्नांबाबत काय निर्णय दिला आहे ? माझ्या स्वतःचा गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव काय आहे - इत्यादी गोष्टींची चर्चा या लेखात केली आहे. प्रचलित भारतीय ज्योतिष शास्त्रांत शुभ आणि अशुभ स्वप्नांबाबत काय मत आहे ते बघू..
शुभ स्वप्ने -
१. रोदन, वीणावादन, नौकेत बसणे , आपल्या शरीरातून रक्त गळत असलेले बघणे, पाण्याने स्नान करणे, आपला मृत्यू, दीप, धन्य, कन्या, पक्षी पाहणे,गाय, म्हैस, वाघीण, सिंहीण यांचे दूध पिणे, राजदर्शन, तृण, दुर्वा असलेल्या भूमीवरून चालणे, माता, पिता, मित्र यांचे दर्शन होणे ही स्वप्ने आनंददायक असतात.
२. निरभ्र आकाश, स्वतःचे चालणे, पुलावरून न अडखळता पलीकडे जाणे, प्रेतदर्शन, मेजवानीचा समारंभ फक्त पाहणे, घर बांधणे, जिन्यावर किंवा शिडीवर चढणे, गायन वादन ऐकणे, पशुंचा समुदाय पाहणे, या स्वप्नांनी त्वरित कार्यसिद्धी होते.
३. मुंग्या पाहणे, स्वतः उत्तम पोशाख केलेला पाहणे, आपल्याला कोणी पकडलेले पाहणे, धन्य, कापड यांची खरेदी, किल्ला या वस्तू स्वप्नात पाहणे शुभ होय.
४. कापूस, भस्म, भात, ताक यावाचून इतर पांढरे पदार्थ स्वप्नांत दिसणे चांगले. गाय, देव ब्राह्मण, हत्ती यावाचून इतर सर्व काळे पदार्थ स्वप्नांत दिसतील तर वाईट समजावे.
५. तलाव, नदी, समुद्र तरून जाणे किंवा पाहणे, चंद्र / सूर्याची मंडळे पाहणे, मोठ्या राजवाड्यावर चढणे, माडीवर किंवा पर्वतावर चढणे, मद्य पिणे, मांस खाणे, विष्ठा अंगास लागणे, रक्ताचे स्नान होणे, दहीभाताचे भोजन, खीर पिणे, पांढरे वस्त्र, गंध, फुले, रत्ने, अलंकार पाहणे, अशा स्वप्नांनी मोठा मान सन्मान प्राप्त होतो.
६. देव, ब्राह्मण, राजा, हत्ती, हरिण, घोडा, सोने, उत्तम अलंकार घातलेल्या व पांढरी वस्त्रे नेसलेल्या स्त्रिया पाहणे,सिंह, घोडा, बैल, उंबर, पर्वत, ताड, माड, इ. फळझाडे यांवर चढणे, आरसा, मांस, कमळे, यांची प्राप्ती होणे, पांढऱ्या सापाने उजव्या हाताला दंश करणे, पाण्यात उभे असता सुसर चावणे, विंचू चावणे, आपल्यास बांधलेले पाहणे, शरीर, घर, पालखी, गाडी, इ. ला आग लागलेली पाहणे, कोंबडी, बेडूक, मोर इ. पाहणे, जंगलात भटकणे , इत्यादी प्रकारच्या स्वप्नांनी धनलाभ, स्त्रीलाभ व कार्यसिद्धी होते.
७. एखाद्या माणसाचा मृत्यू स्वप्नात पाहिला असतां, त्या माणसाला आरोग्य प्राप्त होते व त्याची आयुष्य वृद्धी होते.
अशुभ स्वप्ने :-
१. मधमाशांना उडताना पाहणे, भूमीवरील द्रव्य गोळा करणे, कर्ज घेणे, बंदुकीचे आवाज ऐकणे, हातत चाकू घेणे हि स्वप्ने दु:खमुलक असतात.
२. पळस, वारूळ, कडूनिम्बावर चढणे, तेल, लोखंड, कापूस यांची प्राप्ती होणे शरीराला पिडा देतात.
३. लग्न किंवा घड्याळ बंद पडलेले पाहणे हे स्वप्न कोणाची तरी मृत्यूवार्ता कळण्याचे सूचक आहेत.
४. कोळसे तांबडे वस्त्र, तांबड्या फुलांच्या माळा आकाशातून तारे पडणे, तूप, तेल अंगास लावणे, केस गळणे, दात पडणे, उन्ता, कुत्रा, गाढव, टोणगा, म्हैस, डुक्कर, यांचे दर्शन होणे, प्रेताशी आलिंगन देणे, काळा व नग्न पुरुष पाहणे, नाक कान तुटणे, पाण्यात किंवा चिखलात बुडणे, या गोष्टी स्वप्नात पाहिल्या असता, धनहानी, संकट व शरीराला क्लेशकारक होतात.
५. हजामत करणे, नख काढणे, पक्वांनांचे भोजन करणे, काळे पुरुष पाहणे, अमंगल व काळ्या स्त्रीस भेटणे, कोणाचे तरी पत्र येणे, कावळा , घुबड, कोल्हा , गिधाड, मांजर यांचे दर्शन होणे, उंचावरून खाली पडणे, आपल्यापासून फुले, फळे, अलंकार कोणी हिसकावून घेत असलेले पाहणे, ऊन, पाणी पिणे, श्राद्ध, पिंडदान करणे, स्वतः गाणे, हसणे, रागावणे, झोपल्यावर झोके घेणे, ढग आलेले पाहणे, राजद्वारी आपणास दंड होणे, गुहेत किंवा अंधारात जाणे, ही स्वप्ने हानीकारक होतात.
ज्योतिष शास्त्र दृष्ट्या स्वप्न फलादेश काल :- रात्रीचे पाहिल्या प्रहरात पडलेले स्वप्न एक वर्षाने फलदायी होते, दुसऱ्या प्रहरात पडलेले स्वप्न आठ महिन्याने फळ देते, तिसऱ्या प्रहरात पडलेले स्वप्न तीन महिन्याने फळ देते, चौथ्या प्रहरात पडलेले स्वप्न एका महिन्यात फळ देते, अरुनोदायी स्वप्न पडले तर दहा (१०) दिवसात फळ मिळते, व सूर्योदयाचे वेळी स्वप्न पडल्यास तत्काळ फळ मिळते.
गाढ झोप लागली असता स्वप्ने पडत नाहीत असे प्राचीन शास्त्रकारांचे मत आहे.
"एखादा पक्षी आकाशात उडत असता दमला तर तो आपले पंख मिटून विश्रांतीसाठी घरट्याकडे धाव घेतो , त्याप्रमाणे दिवसा काम केल्यावर रात्रीचे वेळी विश्रांतीसाठी माणूस गाढ झोपतो आणि अशा प्रकारच्या गाढ झोपेत तो कोणत्याही विषयाची इच्छा करत नाही व त्यास कसलेही स्वप्न पडत नाही. " बृहदारण्यक उपनिषद
" सर्व इंद्रिये मनात लीन झाली असता झोप येते " प्रश्नोपनिषद
" जेव्हा मनुष्यास गाढ झोप लागते व स्वप्न पडत नाही त्यावेळी त्याचा आत्मा नदीमध्ये प्रविष्ट झालेला असतो " छांदोग्य उपनिषद
"जित कोणत्याही वस्तूचे भान होत नाही अशा चित्तवृत्तीस निद्रा म्हणतात " पातंजल योगसूत्र.
आता प्राचीन ऋषींचे स्वप्नाबाबत काय मत आहे ते पाहू :-
" स्वप्नात आपला आत्मा आपल्या घरट्यातून बाहेर पडून वाटेल तिकडे भ्रमण करतो. प्राणवायूच्या सहाय्याने आपल्या घरट्याचे संरक्षण करित हा अमर असा हंसरूपी व हिरण्यमय पुरुष आत्मा आपले घरटे जो देह त्यातून बाहेर पडून स्वच्छ्न्दाने विहार करता येईल अशा ठिकाणी उडून जातो. स्वप्नांचे अंती हा देव इतस्ततः हिंडत राहून अनेक रूपे निर्माण करतो, सुंदर स्त्रियांचे सहवासात राहतो किंवा काही खात राहतो किंवा भयानक देखावे पाहतो. " बृहदारण्यक उपनिषद
" स्वप्नात आत्म्यास आपल्या मोठेपणाचा अनुभव येतो. जे नेहमी दृष्टीस पडते ते तो पुन्हा एकवार स्वप्नांत पाहतो, तो जे नेहमी ऐकतो ते पुन्हा स्वप्नांत ऐकतो. दृष्ट - अदृष्ट, श्रुत अश्रुत, अनुभूत - अननुभूत, सत - असत या सर्वांचा तो अनुभव घेतो कारण हे सर्व त्याचे रूप आहे " प्रश्नोपनिषद
"स्वप्नावस्थेत आत्म्यास सूक्ष्म वस्तूंचे ज्ञान होते व त्यांचा तो उपभोग घेतो. तेव्हा त्यास तेजस म्हणतात." मंडूक्योपानिषद
मृत माणसे पण स्वप्नात येऊन संदेश देतात :-
सर ऑलिव्हर लाँज या नामांकित शास्त्रज्ञाने त्यांच्या " Why I believe in Personal Immortality" या पुस्तकात दिले आहे ते असे :- अमेरिकेत जेम्स चँफीन नावाचा गृहस्त ७- ९ -१९२१ रोजी वारला. त्याने मृत्यूपूर्वी १६ वर्षे अगोदर केलेले मृत्युपत्र कोर्टात हजर केले गेले. त्या मृत्युपत्रात सर्व इस्टेट पहिल्या मुलाला द्यावी असे होते. कोर्टात प्रकरण चालू असता चँफीनचे दुसऱ्या मुलाला स्वप्नात वडिल दिसले व त्यांनी त्याला घरातील बायबलचे प्रकरण सत्तावीस मधील पानांत नवीन मृत्यू पत्र ठेवल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तपास करता दुसरे मृत्युपत्र सापडले.
उपासकांना त्यांची उपास्य दैवते स्वप्नात येऊन संदेश देतात :- पुण्यातील श्री. भट यांनी "ईश्वरी साक्षात्कार " यावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात एका गृहस्थाला हृदयविकार होता. तो कसा बारा झाला या बाबत असे दिले आहे -
"डॉक्टर गोडबोले या अक्कलकोट स्वामींचे उपासकाला स्वामी स्वप्नात दिसले व त्यांनी त्या हृदयविकाराचे रोग्याला एक मंत्र म्हणावयास सांग असे डॉक्टरांना सांगितले. श्री. गोडबोले यांनी त्या रोग्याला तसे सांगितले. त्या उपचारानंतर तो रोगी बारा झाला "
पूर्वीच्या अनुभूतिंचा सुटा किंवा मिश्र पुनःप्रत्यय स्वप्नात येतो :-
मनुष्य निद्रेत असला की त्याचा जड देह व प्राणमय कोष बिछान्यावर असतो व त्याचा वासनामय देह थोडा सुटा असतो. अनेक पुर्वानुभावांची बीजे मनांत साठलेली असतात त्यापैकी एक एक बिज सुटे स्वप्नसृष्टीत दिसते किंवा एकाहून जास्त बीजे एक – समयावच्छेदे करून स्वप्नसृष्टीत दिसतात. वासनामय देह देहाबाहेर पडून दूरच्या प्रदेशातील अनुभूति घेतो व ती अनुभूती स्वप्नात साकार होते. पुष्कळदा स्वप्नांत, न पाहिलेला भूभाग, जलाशय, पर्वत, समुद्र, अरण्ये, शहरे, इमारती इ. दिसतात . अशा वेळी वासनामय देह, जडदेह सोडून दूरवर जातो व त्या नवीन प्रदेशाची अनुभूति स्वप्नांत येते.
भविष्यकाळात घडणाऱ्या सुखद किंवा दु:खद प्रसंगाबाबत स्वप्नातून सूचना मिळतात :-
माझे पत्नीस धांवरे झाले होते. त्यावेळी माझे स्वप्नांत खूप लांब साप दिसला व स्वप्नात मी त्यास मारले. स्वप्ने पडलेले दुसऱ्या दिवशीच वैद्याचे औषध सुरु झाले व पत्नी बरी झाली.
शरीर रोग ग्रस्त असता स्वप्ने पडतात :-
वैद्यक शास्त्रा प्रमाणे त्रिदोष सम असतील तर शरीर निरोगी राहते. वात विकाराचे रोग्यांना वायूचे गुणधर्माप्रमाणे स्वप्न पडतात . स्वप्नांत राक्षसासारखे आकाराचे प्राणी दिसणे. अगदी लहान आकाराचे शरीर दिसणे. कड्यावरून खाली उडी टाकणे, धावणे , इ दिसणे. पित्त विकाराने ग्रस्त माणसास रंगीत वस्तू, रंगीत फुले, रंगीत झाडे, रंगीत वस्त्रे, वणवे, मोठा जाळ, फैलावलेला प्रकाश इत्यादी बाबत स्वप्न पडतात. कफ विकाराने ग्रस्त माणसास साधारणपणे बंधनाची स्वप्ने दिसतात. पू, रक्त, विष्ठा, कफ, इत्यादी शरीरातील उत्सर्जित द्रव्ये दिसतात. कोणी पकडणे, कोंडले जाणे, इ. स्वप्ने दिसतात.
स्वप्न पडणे हि एक विकृती आहे.वैद्यकीय उपचाराने ती बरी होते. जवळ जवळ ५०% स्वप्ने शारीरिक विकृतीमुळे पडतात. वासना अतृप्त राहिल्याने वासना पूर्तीची स्वप्ने पडतात. समाधानी वृत्ती बनवून हि स्वप्ने टाळता येतील .
अस्थिर चित्ताचे लोकांना, वासनामय देहाचे बाहेर हिंडण्याने स्वप्ने पडतात. झोपताना एखाद्या बिंदूवर , नादावर किंवा विचारावर , पूज्य व्यक्ती किंवा देवतेच्या रूपावर चित्त स्थिर केल्यास शांत झोप लागून स्वप्न पडणार नाहीत. सूचक स्वप्ने कोणास नको आहेत ? ज्योतिष शास्त्राचे दृष्टीने विशेष ग्रहयोग असल्यास स्वप्ने पडतात व त्यावर शास्त्रीय उपचार पण आहेत. पण विस्तार भयास्तव जास्त लिहिता येणार नाही.
II इति शं II
The article can be downloaded in scanned form from below link :-